धानखरेदी केंद्र त्वरित सुरू करा* माजी मंत्री बडोले यांची मागणी
गोंदिया ,दि.7-धानखरेदी केंद्र त्वरित सुरू करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह केंद्रावरील इतर समस्यांना घेवून माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी सडक अर्जुनी येथील कार्यालयात जिल्हा मार्केटिंग अधिकारी वाजपेयी यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, दरवर्षी १ ते ५ मे पर्यंत जिल्ह्यातील सर्वच केंद्र सुरू होतात. मात्र यावर्षी महिना उलटूनही अद्यापही धानखरेदी केंद्र सुरू झालेले नाहीत. सडक अर्जुनी तालुक्यात फक्त ३ केंद्र सुरू झालेली आहेत. यात सौंदड, पांढरी व धानोरी या गावातील केंंद्राचा समावेश आहे. त्यातही या केंद्रावर अत्यल्प धानखरेदी झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. उन्हाळी धान खरेदी करण्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची असताना केंद्र सरकारवर जबाबदारी टाकून शेतकर्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात येत आहे. तो संभ्रम थांबविण्यात यावा तसेच केंद्र सरकारने दिलेल्या उद्दिष्टापैकी जिल्ह्यात फक्त १० टक्के धानखरेदी आजपर्यत झाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.
विशेष म्हणजे, धानखरेदी केंद्रावर ऑनलाईन पावती देण्यात येत नाही. जिल्हा मार्केटिंग अधिकार्याने निर्धारीत केलेल्या ४०.६ किलो ऐवजी ४२ किलो धान मोजण्यात येत आहेत. बारदाना शेतकर्यांकडून घेण्यात येत आहे. त्याचे पैसे सुध्दा दिले जात नाही. धानखरेदी केंद्र निर्धारीत ठिकाणी सुरू न करता दुसर्याच ठिकाणी खरेदी केली जात आहे. कोणत्याही धानखरेदी केंद्राने शेतकर्यांमध्ये संभ्रम न निर्माण करता विना मार्केटिंग फेडरेशनने निर्धारीत केलेल्या प्रती एकर १६ क्विंटल धान खरेदी करावी व शेतकर्यांना त्रास देवू नये. जिल्ह्यात ३९ केंद्र मंजूर असून यामध्ये अनेक केंद्राकडे गोडावून नाही. नियम अटींची पुर्तता नसताना सुध्दा राजकीय दबावापोटी केंद्र दिले आहेत. त्यांचे गोडावूनची तपासणी करण्यात यावी अशी मागणी सुध्दा त्यांनी केली आहे. यावेळी पं.स.सभापती संगीता खोब्रागडे, उपसभापती शालिंदर कापगते, जि.प.सदस्य भुमेश्वर पटले, कविता रंगारी, निशा तोडासे, पं.स.सदस्य चेतन वडगाये, माजी सभापती अशोक लंजे, गिरधारी हत्तीमारे, राजेश कठाणे, लक्ष्मीकांत धानगाये, माजी जि.प.उपाध्यक्ष छाया चव्हाण, शिशिर येडे, हर्ष मोदी, किशोर डोंगरवार, प्रशांत झिंगरे, सुशिल लाडे, संदिप रामटेके, पृथ्वीराज भेंडारकर आदी उपस्थित होते.
०००००००००