info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  25 Jun 2022

काँग्रेस–राष्ट्रवादी सोबत आमचा परंपरागत संघर्ष - एकनाथ शिंदे

काँग्रेस–राष्ट्रवादी सोबत आमचा परंपरागत संघर्ष - एकनाथ शिंदे
आसाम,दि.26-एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता आहे. यातच उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आणि एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करीत आहे. गुवाहाटी येथे असलेले एकनाथ शिंदे हे सध्या ट्विट करतच आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. शिंदे यांनी काही वेळेपूर्वीच जळगाव जिल्ह्यातील पारोळा मतदारसंघाचे आमदार श्री.चिमणराव आबासाहेब पाटील यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी त्यात म्हणाले, जळगाव जिल्ह्यातील पारोळा मतदारसंघाचे आमदार चिमणराव आबासाहेब पाटील यांची सुस्पष्ट भूमिकाआहे. आम्ही गेली ३० वर्ष प्रथम काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस सोबत संघर्ष करत आहोत. काँग्रेस – राष्ट्रवादी सोबत आमचा परंपरागत संघर्ष होता.  यापुढेही राहील. पण त्यांच्याकडून दाद न मिळाल्याने आम्ही आमचे नेते एकनाथजी शिंदे यांस ही स्पष्ट भूमिका घेण्याचा आग्रह धरला. नैसर्गिक युती व्हावी ही अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे. म्हणूनच या विचारधारेसाठी केलेल्या या बंडाच्या भूमिकेला पक्षातील दोन तृतीयांश पेक्षा अधिक आमदार आणि १० सहयोगी अपक्ष आमदारांचे समर्थन आहे, असे यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावं यासाठी बंड पुकारले आहे. शिवसेनेच्या काही आमदारांना घेऊन ते गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबतची युती कशी चुकीचे आहे हे सिद्ध करण्यासाठी आज अनेक व्हिडीओ आणि फोटोस आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करत आहेत.
जी घटना सकाळ घडली, ती संध्याकाळी घडेल, या भ्रमात राहू नका… अडकून पडाल, संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना सल्ला
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांना मुंबईत येऊन चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. अनेक बंडखोर आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यातील 10 बंडखोर आमदारांशीही त्यांची चर्चा झाली आहे. शिवसेनेला कोणीही हायजॅक करू शकत नाही, असे राऊत म्हणाले. आमचा पक्ष पैशाने विकत घेता येत नाही. शिवसैनिक भडकले तर ते पेटतील. राऊत म्हणाले की, आम्ही पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना परत येण्याची विनंती करत आहोत. ते म्हणाले की बकऱ्यासारखे वागणे बंद करा. काल शरद पवार यांच्यासमोर बैठक होत असताना त्यावेळी 10 बंडखोर आमदारांचा फोन आले. या भ्रमात राहू नका, तुम्ही अडकून पडाल, असेही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावले. राऊत यांनी फडणवीस यांना अजित पवार यांच्यासोबतच्या शपथविधीची आठवण करून दिली.

 
शिवसैनिक अद्याप रस्त्यावर उतरलेले नाहीत, असा इशारा संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना दिला. ते जर रस्त्यावर उतरले तर आग लागेल. तुम्ही या भानगडीत पडू नका, अडकून पडाल, असा सल्लाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला. सकाळची घटना झाली ती घटना संध्याकाळी घडू नये. फडणवीस आधी आपली प्रतिष्ठा वाचवा. तुम्ही या भांडणात न पडल्यास बरे होईल.
ठाण्यात कलम 144 लागू
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर ठाणे आणि लगतच्या परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. जिल्ह्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड होण्याची भीती असल्याने पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. संजय राऊत यांनी शिवसैनिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. जे बंडखोर आमदार महाराष्ट्राबाहेर आहेत, तिथे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांनीच घ्यावी. तुम्ही आमच्या राज्यात असता, तर तुमची जबाबदारी आमची असती. आम्ही कोणत्याही आमदाराची सुरक्षा काढलेली नाही, असेही ते म्हणाले.